'दुर्दम्य आशावादी डॉ. रघुनाथ माशेलकर' हा ग्रंथ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे प्रेरणादायी चरित्र असून याचे लेखन डॉ. सागर देशपांडे यांनी केले आहे . 'पेटंट मॅन ऑफ इंडिया' म्हणून ओळखले जाणारे डॉ. माशेलकर हळद व बासमती तांदळावर झालेल्या आंतरराष्ट्रीय पेटंट लढ्यांमध्ये भारताचे पारंपरिक ज्ञान जपण्यासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णायक भूमिकेसाठी व लढ्यासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र त्यांची कथा या यशांपुरती मर्यादित नाही.
मुंबईतील रस्त्यांवरील दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करणारा, चाचणी लिहिण्यासाठी उत्तरपत्रिकेचे २१ पैसे जवळ नसणारा, ज्याने १२ वर्षे पर्यंत पायात चप्पल घातली नव्हती असा एक गरीब मुलगा ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आणि रॉयल सोसायटीचा फेलो (F.R.S.) असा त्यांचा प्रवास कसा झाला आहे, तर तेजस्वी बुद्धिमत्ता आणि त्याला प्रयत्नांच्या पराकाष्ठेची जोड असा हा प्रेरणादायी प्रवास! त्यांच्या विधवा आईने अनंत अडचणींवर मात करत त्यांचे शिक्षण सुरू ठेवले, आणि त्याच मुलाने नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) आणि वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे (CSIR) नेतृत्व केले.
ही चरित्रकथा एका अशा माणसाची यशोगाथा आहे, जो आजही वयाच्या ऐंशीतही विज्ञान आणि नवप्रवर्तनाच्या माध्यमातून देशासाठी कार्यरत आहे. 'दुर्दम्य आशावादी डॉ. रघुनाथ माशेलकर' ही केवळ एका व्यक्तीची यशोगाथा नाही, तर भारताचे पुनर्निर्माण करण्यासाठी झटलेल्या जीवनाचे सन्मानपत्र आहे! दृढनिश्चय, विनम्रता आणि दूरदृष्टी यांच्या जोरावर एखाद्या देशाचे भविष्यही घडवता येते हे या चरित्रातून अधोरेखित होते.
